Your cart is empty now.
दिव्य तेज म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर! त्याची आरती करणे म्हणजे त्याच्याच कृपेने प्राप्त झालेल्या प्रतिभेच्या सहाय्याने त्याच्याच गुणांचं गायन करण होय. दिव्य तेजाची जाणीव हाच साक्षात्कार; त्याच्या अस्तित्वाची प्रचिती, आणि कविता म्हणजे त्याला आळवण्याच माध्यम. पंचमहाभुतांनी मिळून सिद्ध झालेल्या कुडीतून पंचप्राणांनी घातलेली आर्त हाक आणि उन्मीलित अवस्थेतील आत्म्याचा उद्गार म्हणजे कविता. परमेश्वरच दिव्य तेज अरूप आणि इंद्रियातीत आहे, पण त्याचा कृपाप्रसाद म्हणजे अलौकिक बुद्धी सामर्थ्य, अभिव्यक्तीच्या कलेची जाण, सजगता, संवेदनशीलता, नेमकेपणाने काटेकोरपणे तोल सावरत व्यक्त होत जाण्याची हातोटी. अगदी प्रथितयश संपादन केलेल्या प्रतिभासंपन्न महान कविला देखील प्रतिभाप्रसाद नेहमीच सर्ववेळ सारख्याच प्रमाणात प्राप्त झालेला असेल असं नाही. प्रकाश आणि अंधाराचा खेळ तर सर्वच प्राणीमात्र नेहमीच अनुभवत असतात. बऱ्याचदा कविला काहीतरी दिसतं, जाणवतं, अस्वस्थ करतं पण व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. देणारा ईश्वर तर अनेक करांनी देतो पण आपले मानवीय दोनच कर असल्याने ते घेण्याची ताकद कमी पडते. कविला बऱ्याचदा जे जाणवतं, ते संदिग्ध आणि शब्दांच्या पलीकडचं असतं. अबोधाच्या पातळीवरची दिव्यत्वाची जाणीव शब्दरूप घ्यायला नाकारते आणि व्यक्त होईस्तोवर स्वस्थता देखील लाभू देत नाही. हा शब्दांचा खेळ जीवघेणा असतो. झालेली जाणीव शब्दांच्या सहाय्याने आकाराला येणं हा कसोटीचा क्षण असतो. प्रत्येक महान कविने हे क्षण अनुभवलेले असतात. पण जाणीवेला योग्य शब्दात न्याय मिळाला तर आईला बाळाच्या जन्मानंतर झालेल्या समाधान आणि आनंदाप्रमाणेच ही अनुभूती असते. म्हणूनच कोणतीही काळजाला भिडणारी, आनंद, दु:ख, आक्रोश, वेदना आणि मानवीय मनोव्यापार व्यक्त करणारी कविता ही तेजाने तेजाची गायलेली आरतीच असते.