Your cart is empty now.
वाहरु सोनवणे, प्रकाश किनगावकर आणि अशोक कोतवाल हे खानदेशातील समकालिन कवितेचे महत्त्वाचे प्रतिनिधी आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर खानदेशासारख्या ग्रामीण आदिवासी बहुल भागात सामाजिक स्तरावर घडून आलेल्या स्थित्यंतरातून ह्या कवींच्या जाणिवांना अभिव्यक्त होण्यास संधी मिळाली. 1975-80 नंतर ओस पडलेल्या खेड्यांमधून शिकलेली तरुण मुले नोकरीच्या निमित्ताने शहरात स्थायिक झाली. हळुहळु ‘शहरी’ होत गेली. पण गावाशी, गावाच्या कृषीजीवनाशी असलेली नाळ मात्र त्यांना तोडता आली नाही. यातून वाट्यास आलेले दुभंगलेपण प्रकाश किनगावकरांच्या कवितेला प्रेरणा देणारे ठरले. ज्यांच्या घरातली पहिली पढिी शिक्षणाकडे वळू लागली आणि मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडू लागली, अशा आदिवासी बांधवांना स्वतःची संस्कृती व जीवनविशेष शहरी संस्कृतीच्या झगमगाटात उपरे ठरत असल्याचे जाणवू लागले. स्वातंत्र्याचे लाभ व लोकशाहीची हमी यांपासून वंचित ठेवल्या गेलेल्या आणि शोषणव्यवस्थेच्या बळी ठरलेल्या आदिवासींचा हुंकार वाहरु सोनवणे यांच्या कवितेतून प्रकट झाला. अशा संवेदनशील मनांची नागरी जीवनाच्या धबडग्यात होणारी घुसमट अशोक कोतवाल यांच्या कवितेतूनही आलेली आहे. आधुनिकीकरण व जागतिकीकरण या नावाखाली सुरु असलेले सामान्य माणसांचे अगतिकीकरण विशेषतः मूल्यर्हास व मानसिक पातळीवरील पडझड याचे सूक्ष्म व मार्मिक भान कोतवालांची कविता व्यक्त करते.