Your cart is empty now.
प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची महत्त्वपूर्ण शाखा असून या शाखेत मानवी निवास, स्थान व भौगोलिक पर्यावरण लक्षात घेऊन पृथ्वीवरील नैसर्गिक पर्यावरणाचे अध्ययन केले जाते. मानवाची प्रत्येक कृती प्राकृतिक घटकांशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष निगडीत असल्याने मानवी क्रियांचेही अध्ययन महत्त्वाचे आहे. परंतू मानवाला अद्यापही निसर्गावर पूर्ण ताबा मिळवता आला नाही. म्हणून प्राकृतिक पर्यावरणाचे महत्त्व स्वयंसिद्ध आहे. मानवाने निसर्गातील घटकांचे निरीक्षण केले त्याचा विकास केला व त्यातून प्राकृतिक भूगोलाचा पाया घातला गेला. प्राकृतिक भूगोलात भूपृष्ठ रचना, भूरुपे, हवामान, हवेचे आविष्कार, जलाशय, वनस्पती आणि प्राणी जीवनांचा अभ्यास समाविष्ट होतो. विशेषत: शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण या चार प्रमुख घटकांचा व त्यांचा मानवी जीवनावर होणार्या परिणामाचा अभ्यास प्राकृतिक भूगोलामध्ये होतो. मानवाने कितीही प्रगती केली असली तरी अद्यापही निसर्गावर पूर्ण ताबा मिळवता आला नाही. मानवाने निसर्गातील घटकांचे निरीक्षण केले त्यांचा वापर व विकास करून प्राकृतिक भूगोलाचा विकास केला गेला आहे. पृथ्वीवरील सर्व घटकांचे ज्ञान मिळविण्यासाठी प्राकृतिक भूगोलात विविध विभाग केलेले आहेत. त्यात पृथ्वीची घनरूप अवस्था म्हणजे शिलावरण, पृथ्वीची द्रवरूप अवस्था म्हणजे जलावरण, वायु अवस्था म्हणजे वातावरण आणि पृथ्वीवरील सजिवांचे अस्तित्व असलेले म्हणजे जीवावरण होय. वरील सर्व अवस्थांचा शास्त्रशुद्ध अभ्यास प्राकृतिक भूगोलात केला जातो. या शाखेत निसर्गतः निर्माण झालेल्या घटकांचा अभ्यास केला जाऊ लागला. यात विविध भूरूपे (पर्वत, पठार, मैदान आणि त्यांची निर्मिती), हवामान, मृदा, जलाशय, खनिजे, वनस्पती आणि प्राणी इ.नैसर्गिक घटकांचा समावेश प्राकृतिक भूगोलात केला गेला.