Your cart is empty now.
अहिल्याबाई होळकर ह्या राजकार्यधुरंधर, सदाचारसंपन्न, स्वधर्मनिष्ठ आणि दानशूर महाराणींचे नाव हिंदुस्थानच्या इतिहासात अजरामर होऊन राहिले आहे. भारतात जेवढी म्हणून पवित्र आणि सर्वांना वंदनीय अशा तीर्थक्षेत्रांना अहिल्याबाईंनी धर्मदाय कर्तव्य केले. त्यांच्या धार्मिक औदार्यामुळे अहिल्याबाईंची धवल कीर्ती अजरामर झाली आहे. सदावर्ते, अन्नछत्रे, धर्मशाळा, देवालये, घाट, विहिरी, रस्ते इत्यादी नाना प्रकारच्या पुण्याच्या कामांचा कीर्तिमहिमा सतत आबालवृद्धांच्या मुखामध्ये आहे. या कर्मयोगिनी मातेचे अत्यंत पवित्र, सुरस, बोधपर, साधार आणि सविस्तर असे ऐतिहासिक चरित्र फार कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. अहिल्यादेवींचे राजकारण चातुर्य, त्यांची राजनिष्ठा, त्यांची तेजस्विता, त्यांची दानशूर वृत्ती, त्यांची सत्यप्रीती, त्यांचे सौजन्य, त्यांची क्षमाशीलता, त्यांची करुणा इत्यादी असामान्य व अप्रतिम सद्गुणांचा जीवनपट योग्य तथ्यांसह जनतेपुढे आलेला दिसत नाही.
सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या अहिल्याबाई एका वैभवशाली होळकर राज्याच्या स्वामिनी बनल्या. त्या शूर, लढवय्या, चांगल्या रणनीतिज्ञ आणि न्यायीवृत्तीच्या होत्या. त्यांच्या जीवनात अनेक संकटे आली. अनेक मोठ्या दुःखांना त्यांना सामोरे जावे लागले. पण प्रजेच्या कल्याणात आणि सेवेतच आपला मोक्ष आहे हे ओळखून त्यांनी आयुष्यभर जनहिताची असंख्य कामे केली. त्यांनी धर्माचरण आणि राजकारणाची सुयोग्य सांगड घातली. कर्तव्यनिष्ठा, धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव यांचा मापदंड त्यांनी घालून दिला. अत्यंत साधे निर्मळ जीवन आणि पराकोटीचे दातृत्व ही त्यांची ओळख होती.
अहिल्यादेवी धार्मिक होत्या असे म्हणण्यापेक्षा त्या आध्यात्मिक होत्या असे म्हटले पाहिजे. कारण धार्मिकतेत विवेक जागृत असला आणि मानवता मनात असली तरच आध्यात्मिकता साधता येते. अहिल्याबाई विवेकी होत्या, मानवतावादी होत्या, धार्मिक होत्या, नैतिक होत्या म्हणून आध्यात्मिक होत्या. आध्यात्मिक होत्या म्हणून आयुष्यातील पराकोटीचे दुःख पचवून जनहिताचा, राष्ट्रहिताचा राज्यकारभार त्यांनी चालविला. अहिल्यादेवी सात्त्विक होत्या म्हणूनच त्यांच्यात नैतिकता होती, माणुसकी होती, शाश्वत मानवी मूल्यांची आंतरिक ओढ होती आणि सहकार्याची अखंड जाणीव होती. संपूर्ण देशभरातील माता भगिनींसमोर आणि जगासमोर त्या एक परिपूर्ण आदर्श व्यक्तिमत्त्व होत्या असे म्हणता येईल.