Your cart is empty now.
महाराष्ट्राच धार्मिक जीवनात विठ्ठल हा एक परवलीचा शब्द आहे. अकराव्या शतकापूर्वी कृषी जीवन जगताना नदीच्या वाळूत विठ्ठल नामाचा गजर करीत समतेची हाक देत मानवतेच्या शाळेची मुहूर्तमेढ रोवली गेली. तुळशीचा हार, कपाळी गंध, हातात टाळ एवढ्या गणवेशातील काही समाजधुरीनांनी ही शाळा सुरु केली. आणि पाहता पाहता ही शाळा मानवतेचे विद्यापीठ बनले. माणूस, माणूसकी, मानवता हे अभ्यासक्रमातील घटक अर्भयासण्यासाठी आषाढी कार्तिकीला शेतीची कामे आटपून संसारी माणसे मानवतेची पताका घेऊन दिंडी दिंडीने या शाळेत येऊ लागलेत. या वारीत सहभागी होणारे वारकरी अठरा पगड जातीधर्माचे होते. मानवतेच्या विद्यापीठाचे वारकरी म्हणून पंढरीची वाट चालू लागले. विठू नामाच्या शाळैचे ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांच्या सोबतीला गोरोबा, विसोबा, मुक्ताई, जनाई, सोयरा असे अनेक मान्यवर होते. त्यांनी वारकरी संप्रदाय विकसीत केला. व माणसाला माणूसकीची शिकवण दिली.
आज महाराष्ट्रात पंढरीरायाचे दर्शन घेणारे सर्व भाविक मानवतेचा व शांततेचा वसा घेऊन वारी करतात. वारीला धार्मिक अर्थ असला तरी सामाजिक दृष्ट्या ही एक चळवळ आहे. मानवतेचा तो एक लाँगमार्च आहे. एक इव्हेंट आहे. हे तत्त्वज्ञान अखंडपणे संस्कारीत व्हावे म्हणून समाजभाषेतून लिहिणार्या कवींना संत म्हणून समाज गौरवाने मिरवितो. प्राणीमात्रा विषयी अपार करुणा, दया, प्रेम असलेल्या या संतांचे कार्य व तत्त्वज्ञान काव्यरुपाने अभ्यासतांना भाषा, समाज, संस्कृती यांची शिकवण मिळते. हे कार्य तुकडोजी महाराज, गाडगेबाबांच्या रुपाने अंखडपणे सुरु राहिले कारण संतांचे हे काव्यच मुळी अभंग आहे.