Your cart is empty now.
नव्या सहस्रकाच्या उंबरठ्यावर ग्रामीण जनजीवनाची वाताहत ज्या भयानक रूपात होत आहे, त्याला गेल्या शतकात तरी तोड नाही. अनेक समस्यांनी घायाळ झालेला हा समाज हळूहळू का होईना जागा होत आहे; याच समाजातून आलेले सर्जनशील लेखक नव्या पिढीचे साहित्यिक म्हणून प्रा. सदानंद देशमुख आता सर्वपरिचित झाले आहेत. त्यांनी आपल्या कादंबरीतून ग्रामजीवनाच्या व्यथा-वेदना आणि समस्यांना सशक्तपणे शब्दरूपाने अविष्कृत केले आहे. त्यातलीच ‘तहान’ ही कादंबरी.
‘तहान’ ही कादंबरी अनेक दृष्टींनी महत्वाची साहित्यकृती मानली जाते. ग्रामीण जीवनातील पाण्याच्या महत्वाच्या प्रश्नाला तर ती जिवंतपणे साकार करतेच, पण ही ‘तहान’ केवळ पाण्यापुरती न राहता ती पैसा, भोगलालसा, दोन पिढ्यांतील व दोन संस्कृतीतील मूल्यसंघर्ष अशा अनेक गोष्टींना व्यापून राहते. त्यामुळे या कादंबरीला अनेक प्ररिमाणे प्राप्त होतात. या कादंबरीतील वैशिष्ट्यपूर्ण पात्रे प्रसंग, जिवंत भाषाशैली-अशा अनेक घटकांमुळे ही कादंबरी वाचकाच्या मनाची पकड तर घेते, शिवाय मूलभूत मानवी प्रश्नांच्या बाबत त्याला विचारप्रवृत्तही करते.