Your cart is empty now.
नवीन अभ्यासक्रम आला की, पहिल्या वर्षी विद्यार्थ्याची तारांबळ उडते. कारण नव्या अभ्यासक्रमात काळानुरूप नव्या बाबी बहुतेक करुन समाविष्ट झालेल्या असतात. त्यामुळे त्याचे अवलोकन व अभ्यास करतांना अनेक पुस्तके व संदर्भ ग्रंथाचा आधार घ्यावा लागतो. कोणताही एक घटक हा एका पुस्तकातून पूर्ण होत नाही. त्यातून वेळ, पैसा व श्रम हे जास्तीचे खर्च होतात. ही अडचण लक्षात घेता अभ्यासक्रमावर आधारीत विद्यार्थ्याची ज्ञानाची गरज पूर्ण व्हावी, या हेतूने या पुस्तकाचे प्रयोजन आहे.
‘मानसशास्त्र’ हा विषय आता बंदिस्त राहिलेला नाही. याची व्याप्तीही दिवसेंदिवस वाढत आहे. या विषयाबाबतची कुतूहलता, विद्यार्थी, शिक्षक व व्यक्ती या सर्वांचीच वाढत आहे. सद्यस्थितीत फार मोठ्या प्रमाणात ताणतणाव, चिंता, भिती, आसक्ती वाढत आहे, त्यामुळे सुख, समाधान, मानवी मनापासून दुरावल्या गेले आहे. मानसिक समस्या वाढत आहे. त्यातून शारीरीक समस्या उद्भवत आहे. व्यक्तीची जसजसी दमछाक व कोंडी होत आहे. तसतसा व्यक्ती केंद्रित होत आहे. त्यातून सुटण्याचे अनेक मार्ग व्यक्ती चोखाळतांना दिसतो आहे. म्हणूनच सामान्य व्यक्तीलाही ‘मानसशास्त्र’ विषय वरदानच ठरत आहे. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणामध्ये प्रत्येक घटक हा व्यवस्थित व साजेश्या, सोप्या पद्धतीने मांडण्याचा, उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यातून विद्यार्थ्यांना व सामान्य व्यक्तीला सुद्धा या पुस्तकातील सर्वच संकल्पना स्पष्ट होतील व जीवन उपयोगी ठरतीलच.