Your cart is empty now.
महात्मा गांधी हे आदर्शवादी व युगप्रवर्तक नेते होते. त्यांनी राजकारणाला व्यावहारीक अशी नवी अधात्मवादी दृष्टी दिली. अन्यायाचा प्रतिकार सत्य, अहिंसा व सत्याग्रहाच्या मार्गाने करता येतो हे त्यांनी दाखवून दिले. गांधीजींनी ग्रामपातळीपासून ते देशपातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकारणात, समाजकारणात शुद्धीकरणाला महत्व दिले. त्यांचे सामाजिक कल्याण, अस्पृश्यता व जातीय ऐक्य, महिला सबलीकरण, शिक्षणासंबंधीचे विचार तसेच आर्थिक क्षेत्रात भांडवलवाद व नागरीकरण, आरोग्य आणि स्वच्छता तसेच शेतकरी, कामगार, आदिवासी व अल्पसंख्याकांसंबंधी विचार हे अद्वितीय विचार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक क्रांतिप्रवाहाचे कृतिशील विचारवंत व नेते होते. 20व्या शतकातील महान विचारवंत, प्रकांड कायदेपंडित, थोर समाजसेवक, दूरदर्शी राजकारणी म्हणून ते ओळखले जातात. डॉ. आंबेडकरांचे जीवन-कार्य अलौकिक व अनन्यसाधारण असून, आधुनिक भारताच्या जडणघडणीत त्यांचे योगदान खूप मोठे आहे. उत्तम प्रशासक, थोर बुद्धिवादी व सिद्ध हस्तलेखक, ग्रंथकार, कुशल संघटक, दलितांचे महान नेते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तसेच सामाजिक विज्ञानाच्या प्रमुख ज्ञानशाखांतील तत्वचिंतक अशा विविध क्षेत्रांतील त्यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण असून त्यांनी केलेले समाजकारण, राजकारण, अर्थकारण, राज्यघटना, शिक्षण या विषयावरील मूलगामी चिंतन, विश्लेषण व कार्य भारतीयांना प्रेरक, पूरक व मार्गदर्शक असे आहे.
महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्या दोन महापुरुषांनी आपल्या विचार व कृतीने जनमानसात नवजागृती निर्माण करून समताधिष्ठीत मूल्यांची जपवणूक करून आधुनिक भारताची निर्मिती करण्यात सिंहाचा वाटा उचलला.