Your cart is empty now.
‘अनुभूतीचा आविष्कार’ म्हणजेच साहित्य होय. लेखकाला झालेली ही ‘कलात्मक अनुभूती’ सार्वत्रिकतेचा स्पर्श झाल्यामुळे आनंददायी असते. रसिक वाचक तिचा आस्वाद घेतो. त्यातील ‘जीवनानुभव’ समजून घेऊन आपली जाण समृद्ध करतो. म्हणूनच मानवी जीवनात ‘साहित्य’ क्षेत्र महत्त्वाचे ठरते. ‘साहित्य विचारा’इतकेच महत्त्व ‘साहित्य समीक्षे’ला आहे. समीक्षा व्यापार हा ‘साहित्यकृती’शी संबंधित आहे. लेखक-रसिक वाचक-समीक्षक त्या साहित्यकृतीतील आशय समजून घेऊन आपले अनुभवविश्व समृद्ध करतात. समीक्षक विशिष्ट साहित्यकृतीचे संदर्भात सर्वसमावेशक अशा मूल्यमापनातून आपला ‘मूल्यनिर्णय’ देतो तेव्हा समीक्षा साकारते. साहित्य व समीक्षा हे अभ्यासक्षेत्र परस्पराश्रयी आहे. या दोन्ही क्षेत्रातील मूलभूत संकल्पना समजून घेतल्या म्हणजे त्याच्या निर्मितीची क्षमता आत्मसात करता येते.
प्रस्तुत पुस्तकातून साहित्य व्यापाराशी संबंधित भारतीय व पाश्चात्य साहित्यशास्त्राची संकल्पना, व्याख्या, साहित्याची प्रयोजने, साहित्य निर्मितीची प्रक्रिया, साहित्यांची भाषा, शैलीविचार इ. घटकांचा परिचय करुन देत असतानाच ‘साहित्य आणि समीक्षा’ यांचे परस्पर संबंध, समीक्षा संकल्पना, समीक्षेची भाषा, समीक्षापद्धती यांचाही यथायोग्य परिचय करुन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
Sahitya Vichar V Samiksha