Your cart is empty now.
डॉ. कैलास वानखडे यांनी ‘गुलामगिरी : मूल्य आणि अन्वयार्थ’ हा ग्रंथ लिहितांना या ग्रंथातील मूल्यात्मकता आणि सामाजिकता यांची आस्वादक मीमांसा करण्याची जी वैचारिक भूमिका घेतली आहे, ती स्तुत्य असून; त्यामुळे ‘गुलामगिरी’ या ग्रंथांचे क्रांतिकारकत्व नव्या पिढीला पुन्हा ज्ञात होईल. प्रस्तुत ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी गुलामगिरी ग्रंथातील मूल्यदर्शनाचा प्रामुख्याने वेध घेतला आहे. कारण, हा ग्रंथ जोतीरावांच्या प्रगल्भ सामाजिक चिंतनातून साकार झालेला असून; तो केवळ हिंदू धर्मशास्त्राची चिकित्सा करत नाही तर तथागत बुद्धांनी दिलेल्या मूळ भारतीय संस्कृतीची मूल्ये रूजवितो. त्यामुळे सदर ग्रंथाला वैचारिक व वाङ्मयीन मूल्ये प्राप्त झाले. ही मूल्य केवळ मूल्य नाहीत तर ती जीवन सुखी करण्यासाठी उपकारक ठरलेली ‘मानवी जीवनमूल्ये’ आहेत, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले ते फार महत्त्वाचे ठरते. त्यामुळे ‘गुलामगिरी’ हा मूळ ग्रंथ समजून घेण्यासाठी ‘गुलामगिरी : मूल्य आणि अन्वयार्थ’ हा ग्रंथ वाचकांसाठी मार्गदर्शक वाटाड्या ठरणार आहे.
डॉ. कैलास वानखडेंची तर्कशुद्ध मांडणी, समीक्षेची आस्वादकदृष्टी उत्तम आहे. यामुळे जिज्ञासू व चोखंदळ अभ्यासकांनी सदर ग्रंथ आवर्जून संग्रही ठेवावा, इतका संदर्भयुक्त आहे.