Your cart is empty now.
मध्ययुगीन कालखंडात मराठी वाङ्मय हे वेगवेगळ्या रूपांत अवतरलेले दिसते. या काळात मराठी वाङ्मयनिर्मितीला सुरुवात झाली. मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’ व पहिला पद्यग्रंथ ‘ज्ञानेश्वरी’ यांची याच काळात रचना झाली. महानुभाव संप्रदाय व वारकरी संप्रदाय या दोन महत्त्वाच्या संप्रदायांचा उगमही याच काळात झाला. महाराष्ट्राचे सामाजिक-सांस्कृतिक जीवन या संप्रदायांनी समृद्ध केले आहे. त्यातून समाजात मानवी जीवनमूल्ये रुजली. शाहिरी वाङ्मय हा संत-पंत वाङ्मय प्रवाहांपेक्षा एक वेगळाच वाङ्मयप्रवाह मध्ययुगात जन्माला आला. बखर वाङ्मयाने इतिहास आणि वाङ्मय यांचे अनोखे नाते निर्माण केले. महानुभाव संप्रदायाचे वाङ्मय, वारकरी संप्रदायाचे वाङ्मय, पंडिती वाङ्मय, शाहिरी वाङ्मय व बखर वाङ्मय अशी विविध प्रकारची वाङ्मयनिर्मिती या कालखंडात विपुल प्रमाणात झाली.प्रस्तुत पुस्तकात महानुभाव संप्रदायाचे गद्य-पद्य वाङ्मय, वारकरी संप्रदायाचे पद्य वाङ्मय, शाहिरी वाङ्मय व बखर वाङ्मय यासोबतच या वाङ्मय प्रवाहांमधील काही निवडक ग्रंथकार व काही निवडक साहित्यकृती तसेच महत्त्वाचे ग्रंथकार व त्यांच्या साहित्यकृती, ग्रंथकाराचे लौकिक जीवन व वाङ्मयीन कर्तृत्व यांचा विस्ताराने परामर्श घेतला आहे. प्रस्तुत पुस्तक हे वाचकांना व अभ्यासकांना वाङ्मयेतिहासाच्या अभ्यासासाठी निश्चितच लाभदायक ठरेल यात शंका नाही.