Your cart is empty now.
मित्रांनो! जगात परिपूर्ण असा कोणताही माणूस नाही. मनुष्य हा गुणदोषांचा पुतळा आहे. समाजात वावरतांना जे दृष्टीस पडत गेले, त्याचे निरीक्षण करत गेलो व त्यातून जे काही हृदयाला भिडले, साठले त्याचे ‘मंथन’ करत गेलो व जे काही अनुभवात आले तेच आपल्यासमोर मांडून नवीन पिढीला संस्कृती-संस्कार, ज्ञान-विज्ञान, अंधश्रद्धा, समाजभान, सेवा, त्याग या विचारांचा परिचय व्हावा, चांगले गुण जोपासता यावेत, भले-बुरे ओळखता यावे, हाच प्रामाणिक हेतू या कवितासंग्रहाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा अल्पसा प्रयत्न मी केलेला आहे. हे निव्वळ माझे विचार आहेत. हे विचार शंभर% बरोबर आहेत असा माझा दावा नाही व या विचारांशी आपण सहमत असावे असाही माझा आग्रह नाही तसेच कुणालाही उद्देशून किंवा कुणावर टिका करणे हा माझा मुळीच हेतू नाही म्हणून जे योग्य वाटेल ते आपण घ्यावे आणि जे अयोग्य वाटेल तो माझ्यातला दोष समजून मला पदरात घ्या, अशी माझी विनंती आहे.
हा कविता संग्रह लिहिण्याचा उद्देश एवढाच आहे की, समाजातील दिशाहिन युवक युवतींनी समाज व देशहिताचा विचार समोर ठेवूनच समाजात डोळसपणे वावरावे, कुप्रथा, अविचार, अंधश्रद्धा, लाचारी, घाणेरडे राजकारण यापासून दूर रहावे. यातून नक्कीच आपले व समाजाचेही भले होईल, असे मला वाटते. म्हणून मनाचे ‘मंथन’ करून त्यात प्रामाणिक अशा घुसळणीने विचारांना घुसळावे व उत्तम असे नवनीत समाजाला देत रहावे असे वाटते.