व्यक्तीच्या विकासात सर्वात महत्त्वाचे काय आहे ते म्हणजे ‘स्वातंत्र्य आणि समता’ होय. स्वातंत्र्य, समता व्यक्तीच्या मुलभूत अधिकारात महत्त्वाची भूमिका बजावतात. भारताला स्वातंत्र्य मिळून आज बहात्तर वर्ष पूर्ण झाली. कायद्याच्या चौकटीत जनतेला मुलभूत अधिकार मिळाले. परंतु सामाजिक चौकटीत वावरतांना व्यक्तीला स्वातंत्र्य आणि समता या अधिकारांचा उपभोग बहुसंख्य लोकांना घेता येत नाही. व्यक्तीला आपले मुलभूत अधिकार मिळत नाहीत. याची अनेक कारणे आहेत. म्हणून जनतेत याविषयी अधिक जागृती निर्माण व्हावी यासाठी हा केलेला छोटासा प्रयत्न.
‘राजकीय सिद्धांत’, ‘भारताचे शासन आणि राजकारण’ या विषयावरील अनेक ग्रंथामध्ये समता आणि स्वातंत्र्य या संकल्पना आणि मुलभूत अधिकार म्हणून लिखाण झालेले आहे. परंतु स्वातंत्र्य आणि समता यावर स्वतंत्र विस्तारीत स्पष्टीकरण असलेला ग्रंथ मराठीत दुर्मिळ आहे.
माणूस हा सामाजिक व राजकीय प्राणी आहे. त्याचा विकास हा समाज व राज्यातच होतो. हे अॅरीस्टॉटलचे विधान त्यामुळे आहे. म्हणून व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे अस्तित्व समाजामध्येच असून त्याला तिथेच त्याचा उपभोग घेता येतो. म्हणून पहिल्या प्रकरणात स्वातंत्र्य या संकल्पनेचे महत्त्व, अर्थ, स्वरूप, स्वातंत्र्य आणि राज्य, भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्याचा अधिकार यांचा समावेश त्यात केलेला आहे. प्रकरण दोन मध्ये सकारात्मक आणि नकारात्मक स्वातंत्र्य, स्वातंत्र्याचे प्रकार आणि स्वातंत्र्याची हमी कशी मिळविता येते याचे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. प्रकरण तीन मध्ये लोकशाहीचा अर्थ आणि मुलभूत अधिकारांचे स्पष्टीकरण केलेले आहे. प्रकरण चार मध्ये समता आणि स्वातंत्र्य यांचे संबंध स्पष्ट केले आहेत. तर प्रकरण पाच मध्ये समतेचा सिद्धांत, समतावादावरील चर्चा, समतावादाचे समर्थन, विषमता वादावरील चर्चा, विषमतेचे समर्थन याचे स्पष्टीकरण केलेले आहे. या ग्रंथात राजकीय संकल्पना: स्वातंत्र्य आणि समता यांचा मुलभूत अधिकारांशी संबंध जोडून लिखाण केलेले आहे. याचा मूळ हेतू तळागळातील प्रत्येक व्यक्तीला मुलभूत अधिकार माहित व्हावेत असा आहे.
Rajkiya Sankalpana