महाभारतातील पांडवांच्या पक्षाला ‘कृष्ण’ महत्वाचा आहे त्याप्रमाणे कौरवांच्या पक्षाला ‘कर्ण’ महत्वाचा आहे. दोघांच्याही भूमिकांनी महाभारताच्या जडणघडणीत मोलाचे कार्य केले आहे. कृष्णजीवना इतकेच ‘कर्णजीवनाचे’ आकर्षण प्रतिभावानांना नेहमीच निर्माण झाले आहे. कर्णजीवनात त्याच्या व्यक्तिमत्वातील ‘सुष्ट आणि दुष्ट’ वृत्तीचा संघर्ष आहे. त्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोन भिन्नतेतून ‘कर्णजीवन’ विविधांगी झाले. साहित्य वाङ्मय प्रकारातून ते लक्षात आणून देण्याचा प्रयत्न प्रतिभावानांनी कसा केला आहे. याचे अभ्यासपूर्ण विवेचन प्रस्तुत पुस्तक मांडणीतून लेखिकेने केला आहे. रसिक वाचकांना मराठी साहित्यातील कादंबरी, नाटक, चरित्रग्रंथ, ललितगद्य ग्रंथ इत्यादी वाङ्मय प्रकारांतील प्रमुख 15 ग्रंथातील आशयाद्वारे ‘कर्णजीवन’ एकत्रितपणे समजून देण्याचा लेखिकेचा हा प्रयत्न स्तुत्य आहे. अभ्यासकाच्या भूमिकेतून कर्णजीवनावर आधारित पंधरा साहित्यग्रंथाचे केलेले हे विश्लेषण रसिक वाचकांना त्या-त्या ग्रंथवाचनाचा पुनःप्रत्यय देणारे ठरणार आहे.
पीएच.डी. साठी सादर केलेल्या प्रबंधाचे पुस्तकरुपाने डॉ. वैशाली गालापुरे प्रकाशन करीत असल्याचा आनंद आहे. त्यांचे अभिनंदन! रसिक वाचक त्यांच्या या उपक्रमाचे स्वागत करतीलच!
‘शुभास्ते पंथानः सन्तु । शुभं भवतु ॥’
Marathi Sahityatil ‘Karna’ Jeevan