Your cart is empty now.
अशोक पवारांनी आपल्या साहित्यातून केवळ बेलदार, पारधी, गावोगावी जाऊन रेडिओ विकणारे, वडार, भविष्य सांगणारे ज्योतिषी, बहुरूपी, भीक मागणारे यांचेच प्रश्न मांडले नाही तर इथले भ्रष्ट राजकारण, सामान्य जनतेला लुटणारे पुढारी, स्त्रियांची अब्रू लुटणारी वासनांध पुरुषप्रवृत्ती, स्त्रीचे अगतिक होऊन जगणे यासारख्या समस्यांनाही वाचा फोडली. त्यामुळे प्रस्थापित साहित्यापेक्षा पवारांचे साहित्य निश्चितच वेगळ्या अंगाचे आणि ढंगाचे ठरले.
चार-सहा शब्दांची ठसठशीत वाक्यरचना, डोक्याला आणि मनाला सून्न करून सोडणारे अनुभव आणि बाह्य जगातील माणसांची इथल्या संस्कृतीशी बांधलेली परंपरागत वेदना या सार्या परिपाकातून पवारांच्या भेदक साहित्याची उभारणी झाली आहे. मानवतावादाची एक सच्ची तळमळ त्यांच्या हृदयात पेटताना दिसते.
– डॉ. अनंता सूर