Your cart is empty now.
अनंता सूर यांचे ‘काटेरी पायवाट’ हे एक महत्त्वाचे संघर्षशील आत्मकथन विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि बेरोजगारीची समस्या याविषयी धीटपणे आणि दाहक विचार मांडणारे जळजळीत लेखन आहे. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्ट्राचार, बाजारू वृत्ती, आणि मस्तवालपणा यांसारख्या कुप्रवृत्तीवर अनंतानी आपल्या अनुभवांच्या आधारे नेमकेपणाने बोट ठेवले आहे. सामान्य माणसांचा संघर्ष आणि चिवटपणे जगण्याची जिद्द याचे वर्णन या आत्मकथेत परखड आणि प्रांजळपणे व्यक्त झाले आहे.
बेकारी आणि गरिबीशी झुंज देत लेखकाने जगण्याचा संघर्ष केलेला आहे. दहावीत गणितात दोनदा नापास होऊनही प्राध्यापक होण्यापर्यंतच्या पात्रतेचे उच्च शिक्षण तो घेतो. नौकरीअभावी नागपुरात सायकलने पाच नामांकित महाविद्यालयात तासिका तत्त्वावर काम करतो. प्रचंड उमेद आणि ऊर्जा घेऊन तो बेरोजगारीशी झगडत राहतो. म्हणूनच अनंताचे या आत्मकथनातील दुःख आणि दैन्य वाचतांना वाचक अंतर्मुख आणि आशावादी होतो हे या आत्मकथेचं यश आहे.