Your cart is empty now.
महापुरुष इतिहास घडवीत असतात. महापुरुष काळाच्या प्रवाहाबरोबर वाहत जात नसतात. ते काळालाच घडवण्याचा प्रयत्न करतात. थबकून दूषित झालेल्या काळाला ते शुद्ध करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे प्रवाही ठेवण्याचा प्रयत्न करतात. काळाला वळण देण्याचे सामर्थ्य महापुरुषांमध्ये असते, या अर्थाने ते इतिहास घडवीत असतात. राजर्षी शाहू महाराज सर्वार्थाने महापुरुष होते. बालपणीचे शिक्षण व संस्कार यामुळे महाराजांमध्ये उच्च प्रतीची सामाजिक संवेदना व समाजभान असल्याचे दिसते. ब्रिटिश साम्राज्याच्या पोलादी साखळदंडांच्या मर्यादा असताना महाराजांनी अत्यंत संयमाने व मुत्सद्दीपणाने राज्यकारभारात वर्चस्व असलेल्या युरोपियन व पारशी अधिकाऱ्यांना पद्धतशीरपणे बाजूला काढले. असे असले तरी ब्राह्मणांचे ऐशी टक्के वर्चस्व प्रशासनात होते. राज्य म्हणायला मराठ्यांचे होते. परंतु मराठा व बहुजनांमध्ये शिक्षित व उच्च शिक्षिकांची संख्या प्रशासनात नगण्य असल्यामुळे महाराजांना ब्राह्मण वर्चस्वादाचा खूप मोठा मानसिक त्रास झाला. यावर उपाय म्हणून शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर व इतर पुढारलेल्या जाती सोडून रिक्त जागांवर पन्नास टक्के जागा आरक्षित ठेवण्याचा क्रांतिकारक जाहीरनामा आणला, स्पृश्यअस्पृश्यता नष्ट करण्यासाठी शिक्षणाची आणि वस्तिगृहांची चळवळ उभारली व दलित आणि मागासवर्गीयांना विशेष सवलती दिल्या.
शाहू राजे हे स्वभावाने निकोप, सरळ मनाचे, दिलदार व सत्यनिष्ठ होते. आपलेच ते खरे असे ते मुळीच म्हणणारे नव्हते. त्यांच्या स्वभावात निस्वार्थीपणा आणि विचारांचा सखोलपणा होता. शाहू महाराज नावाच्या नव्या युगाच्या अग्रदूताचे आगमन म्हणजे बहुजनांना वरदानच होते. विद्येत मागासलेल्यांना संजीवनी वाटणारा आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामा प्रसिद्ध करणारे शाहू राजे न्याय व समता या आधारभूत तत्त्वांना समाज जीवनात प्रत्यक्षात रुजवणारे महापुरुष होऊन गेले.