Your cart is empty now.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक संघर्ष व विद्वत्तेतून महामानव पातळीपर्यंतचा सर्वोच्च उत्कर्ष साधला व समाजकारणातून अजरामर झाले. अत्यंत शिस्तप्रिय आणि सुसंस्कारित परिवारात जन्म, संस्कारक्षम मनाची घडवणूक, बालपणीच शालेय शिक्षण घेताना झालेले आघात, दर्जेदार संस्थांमधून झालेलं शिक्षण, हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा, अस्पृश्यता, दलितांवरील अत्याचार, जातिव्यवस्था- अर्थव्यवस्था-राज्यव्यवस्थांचा दांडगा अभ्यास, अमेरिका-इंग्लंडमधील प्रगल्भ समाजव्यवस्थेत राहण्याच्या संधीतून भारतीय समाजव्यवस्थेशी झालेली तुलना या व अशा अनेक कारणांमुळे भीमराव आंबेडकरांचे मन प्रचंड अस्वस्थ झाले. या अस्वस्थतेतून शीलवंत, प्रज्ञावंत, करुणावंत तरुण बॅरिस्टर डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या मनात क्रांतीची ज्योत पेटली. आपल्या संपूर्ण आणि सर्वांगीण अभ्यासाचा आणि उभ्या आयुष्याचा त्यांनी भारतातील बुरसटलेली समाज व्यवस्था बदलविण्यासाठी समर्पित संघर्ष केला. या संघर्षातून प्रखर तेजोमय नेतृत्व उभं राहिलं. या समर्थ नेतृत्वातून त्यांनी सर्वार्थाने परिपूर्ण व पोलादी संविधान देशाला दिलं. हिंदुधर्म परिवर्तनासाठी त्यांनी प्रामाणिक व धाडसी प्रयत्न केले. या प्रयत्नांना अपयश आणि नैराश्य आले. वयाच्या सोळाव्या वर्षापासून बुद्ध धम्माबद्दल बाबासाहेबांच्या मनात आस्था व प्रेम होते. त्याचा परिणाम म्हणून त्यांनी शेवटी हिन्दुधर्म त्याग केला आणि बुद्ध धम्माचा स्वीकार केला. यांबद्दल समजून घेण्याचा प्रयत्नाचा भाग म्हणून प्रस्तुत पुस्तिका.