Your cart is empty now.
निर्मळ आनंदी-समाधानी जीवनासाठी स्वत:चे आरोग्य शारीरिक, मानसिक दृष्ट्या उत्तम, सक्षम असणे अत्यावश्यक आहे. शारीरिक संतुलनासाठी, प्रत्येक आनंदी क्षणासाठी अन्नाचे व्यवस्थापन अत्यावश्यक आहे. आहार, विहार-निद्रा यांचा योग्य समन्वय साधला गेला तर विकाराचा आकारच नष्ट होतो. ‘अन्न हे पूर्ण ब्रम्ह’ आहे. शरीराचे पोट आणि मेंदू ही दोन्ही ‘ऊर्जा निर्मिती केंद्रे’ आहेत. त्यांचे सुस्थितीतील कार्य व गती आपल्या सात्त्विक आहाराशीच संबंधित आहे. शरीराला ‘चैतन्य ऊर्जा’ अन्नातूनच प्राप्त होते. त्याच ऊर्जेतून वासना निर्मिती आणि मेंदू कार्य सुरू होते. शरीर ही एक नैसर्गिक रसायनशाळाच आहे. मानसिक ताण-तणावामुळे रसायनीच संतुलन बिघडते. आहाराचाच सौंदर्याशी घनिष्ठ संबंध आहे. ‘तूप खाल्ल्यानेच रूप येतं’ हा अनुभव जोपासा. चेहराच आपल्या मनाचा आरसा असल्याने बाह्य सौंदर्याबरोबर मनाचे सौंदर्य कायम करणे गरजेचे आहे.
रोग, त्याची लक्षणे आणि त्यावरील औषधे ही माहिती देताना चौधरी दांपत्याचे व डॉ. हर्षल यांनी खूप मेहनत घेतलेली दिसते. त्यांचा या विकारासंबंधीचा अभ्यास सखोल असून तो समाजोपयोगी ठरणार आहे. आयुर्वेद आणि ॲलोपॅथी या दोहोंचा सुंदर समन्वय ‘निरोगी स्वास्थ्यात’ झालेला आहे.