Your cart is empty now.
बोली आणि भाषा या देशाची विरासत आहे. भाषा हे समाजव्यवहाराचे महत्त्वाचे साधन आणि सामाजिक संस्था असल्याने बोली समाजव्यवहारात घट्ट रुतून बसल्या आहेत. मानव जातीच्या प्रगतीचा इतिहास बोलींमध्ये दडून बसला आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतरावजी चव्हाण यांनीही बोलींचे महत्त्व ओळखून ‘बोली या ज्ञानभाषा झाल्या पाहिजेत’ असे महत्त्वपूर्ण उद्गार काढले होते, आणि 11 जानेवारी 1965 ला ‘मराठी’ ही महाराष्ट्राची राजभाषा झाल्यानंतर, हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू। हिला बैसवू वैभवाच्या शिरी’ ही माधव ज्युलियनांची भविष्यवाणी खरी ठरविण्यासाठी राजकीय पातळीवरही पाऊले उचलली गेली होती. ज्या मराठी भाषेला वैभवाच्या शिरावर बसविण्याची शपथ घेतली होती, त्या मराठी राजभाषेची आणि तिला समृद्ध करणार्या तिच्या दीडशेहून अधिक बोलींची काय अवस्था आहे हे ही समजून घेतले पाहिजे. मराठीला 52 बोली आहेत असा दावा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव तयार करणार्या समितीने केला आहे. प्रत्यक्षात मराठीला 150 हून अधिक बोली आहेत. मराठी भाषेला समृद्ध करणार्या तिच्या बोली नष्ट झाल्या तर त्या बोलीतील शब्दांचे अर्थ आणि भावना नष्ट होतील. मराठी भाषा विविध अर्थ आणि भावनांविना लुळीपांगळी होऊन परकीय भाषा तिच्यावर आक्रमण करेल. आज महाराष्ट्रात मराठीवरील इंग्रजीचे आक्रमण वाढते आहे. ते रोखण्यासाठी, मराठीला अधिक समृद्ध करून ती जगाची ज्ञानभाषा होण्यासाठी तिच्या बोलींना जपणे व त्यांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. ‘प्रादेशिक बोलींचे भाषाविज्ञान’ हा महाराष्ट्रातील सत्तावीस प्रादेशिक बोलींचे भाषिक सौंदर्य, बोलींचे समाजशास्त्र, बोलीविज्ञान व व्याकरण व्यवस्था जपणारा आणि संवर्धन करणारा महत्त्वाचा ग्रंथ आहे.