Your cart is empty now.
॥ तीन दगडांच्या चुलीचा भाईबंद! ॥
अशोक पवार हा तीन दगडांच्या चुलीचा एक भाईबंद. भटक्या-विमुक्तांच्या जगण्यातले दु:ख आपल्या स्वकथनातून आणि कादंबरीलेखनातून मांडणारा आपल्या पिढीतील महत्त्वाचा लेखक.
संपूर्ण देशात सत्ताधारी वर्गाकडून कार्पोरेट माहोलाच्या प्रभावातून जनतेला महासत्तेची स्वप्ने दाखवली जात असताना आजही या देशातील भटके-विमुक्त जातिसमूह त्यांच्या मूलभूत गरजांपासून मात्र कोसो दूर आहेत! त्यांच्या जगण्यातील प्राणी पातळीवरचा संघर्ष आणि मानवी पातळीवरील त्यांच्या जगण्यातले दु:ख हे अशोक पवारच्या एकूणच कादंबरीलेखनाचे मध्यवर्ती सूत्र आहे. हे सूत्र आपल्याला भारतीय समाजव्यवस्थेचे समाजशास्त्र आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मानवी संवेदन ह्या अंगाने अंतर्मुख होऊन गंभीरपणे विचार करायला भाग पाडणारे आहे.
या पार्श्वभूमीवर, सामाजिक बांधिलकीच्या अंगाने अशोक पवारच्या कादंबरीलेखनाचे अंत:सूत्र समजून घेण्याच्या दृष्टीने त्यांच्या ‘इळनमाळ’, ‘दर कोस दर मुक्काम’, ‘पडझड’, ‘तसव्या’ आणि ‘भूईभेद’ यांसारख्या कादंबऱ्यांवरील अभ्यासकांचे काही मर्मग्राही लेख एकत्रित करून डॉ. अनंता सूर यांनी संपादित केलेल्या प्रस्तुत ग्रंथातील चिंतन अत्यंत मौलिक स्वरुपाचे ठरावे, असेच आहे. हे चिंतन मराठी साहित्याच्या वाचकमनातील मानवी संवेदनांच्या व समाजशास्त्रीय अन्वयाच्या सहसंबंधाने निश्चितच आकलनाच्या पातळीवरील नव्या दिशा स्पष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरेल, याबद्दल आश्वस्त करणारे आहे.
– डॉ. अशोक नामदेव पळवेकर
Bhatkyanchi Bhramangatha Mandnara Kadambrikar : Ashok Pawar