Your cart is empty now.
प्रखर देशभक्त, चतुर, मुत्सद्दी, कठोर प्रशासक आणि महान स्वातंत्र्य सेनानी सरदार वल्लभभाई पटेल या थोर नेत्यांच्या मनाचे अंतरंग जाणून घ्यावे, त्यातून स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात घडलेल्या घटना जाणून घ्याव्यात, त्याचबरोबर देशाची फाळणी झाली, 564 संस्थानांच्या विलिनीकरणानंतर एकसंध अशा बलवान भारताची निर्मिती झाली, तेव्हा जे काय घडले त्याची लयबद्ध संगती लावावी यासाठी या थोर नेत्यांच अभ्यास करावा, इतिहासाचा खरा अर्थ समजून घ्यावा इत्यादी उद्दिष्ट या पुस्तकाच्या निर्मितीचे आहे. प्रखर देशभक्ती, स्वच्छ चारित्र्य आणि प्रचंड धाडसी स्वभाव हे सरदार पटेलांचे मुख्य भांडवल होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व कणखर आणि करारी होते. कायद्याचा गाढा अभ्यास असल्यामुळे त्यांच्या बुद्धीत प्रखर तेज होते. महात्मा गांधींजींचे पट्टशिष्य आणि त्यांच्यावरील असीम निष्ठेमुळे त्यांच्या प्रत्येक व्यवहारात नैतिकता, निष्काम भाव आणि निस्वार्थीपणा प्रत्येकाला अनुभवता येण्याएव्हढा सुंगधित होता. ग्रामीण भागातल्या एका साध्या शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात उपजत साधेपणा आणि जमिनीशी जोडलेला व्यवहारवाद होता.
स्वांतत्र्य प्राप्तीनंतर दोन ऐतिहासिक घटनांनी वल्लभभाईंना जागतिक कीर्ती मिळवून दिली. देशातील 565 संस्थापैकी 564 संस्थाने विलीन करून एकसंध भारत उभा केल्ाा आणि आय. सि. एस. ही ब्रिटिशकालीन पद्धती बदलून त्यांनी आय. ए. एस. ही भारतीय परीक्षा प्रशासकीय परीक्षा पद्धती लागू केली. या दोन्ही गोष्टी त्यांनी विद्युत गतीने केल्या. कम्युनिस्ट नेते एम. एन. रॉय. यांनी त्यांच्याविषयी म्हटलेले आहे की, “ काश्मीर प्रश्न जर पटेलांकडे असता तर फाळणीनंतर चुटकी सरशी सुटला असता. पटेलांनी मृत्युपूर्वी दिलेला सल्ला जर नेहरूंनी मानला असता तर चीनकडून 1962 मध्ये भारताची झालेली मानहानी टळली असती.”
आदर्श राजनेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल! व्यक्तिमत्त्व विकासासाठी धडपडणाऱ्यांनी सर्वात आधी वल्लभभाई आणि महात्मा गांधींजींचा अभ्यास केला पाहिजे.
1946 मध्ये कॅबिनेट मिशनच्या काळात एक जैन मुनी पटेलांना म्हटले, “सरदारसाहेब, तुम्ही भारताचा इतिहास लिहायला हवा.” त्यावर पटेल मोकळेपणाने हसले आणि म्हणाले, “इतिहास लिहीण्यापेक्षा, आम्ही इतिहास घडवत असतो.” आणि खरोखरच सरदार पटेलांनी इतिहास घडवला.