Your cart is empty now.
वयाच्या तब्बल चाळीस वर्षापर्यंत स्वातंत्र्यलढ्यापासून अलिप्त राहिलेल्या सरदारांनी स्वातंत्र्यलढ्यात प्रवेश केल्यावर त्यास मिळालेली ऊर्जा, गती, दिशा व अनुषंगाने बदललेली लढ्याची सर्वसमावेशक दशा याचे समग्र, सादयंत शब्दचित्रण लेखिकेने प्रभावीपणे, समर्थपणे चित्तारले आहे.
महात्माजींच्या अहिंसेचा सार्थ अर्थ आणि हेतू सरदारांमुळे सिद्ध होतो. शारीरिक मानसिकदृष्ट्या समर्थ असूनही अहिंसेने ‘लढा देऊन’ संघटनशक्तीने विघटनशक्तीचे उच्चाटन करण्याचा पराक्रम ‘सरदारच’ करू जाणे या सर्वांचा शब्दवेल्हाळ परिचय करण्यात लेखिका यशस्वी झालेली आहे.
‘अहिंसेचे जनकत्व’ जसे बापूंकडे जाते तसे भारताच्या अखंडतेचे मातृत्व सरदारांकडे जाते. अखंड, एकसंघ, एकात्म भारतीय संघराज्याच्या निर्माणाचा पुरूषार्थ घडवितांनाच्या घटना, प्रसंग घ्यावे लागलेले कठोर निर्णय याचे समग्र विवेचन परिणामकारकरित्या या पुस्तकात समर्पक व सहज सुलभ शब्दात आपल्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे.
भारतीयांच्या हृदयातले ‘सरदार’ वल्लभभाई पटेल हे चरित्र्यपुष्प सरदारांच्या अनेकविध लोकदुर्लभ गुणवैशिष्ट्यांचा अजरामर कस्तुरीसुगंध भारतीय वाचकांपर्यंत खचितच पोहचविणार आहे यात शंका नाही.
या पुस्तकाच्या अनुषंगाने सरदारांवरील मराठी वाङ्मयात नक्कीच भर पडली आहे. सदर पुस्तक हे समस्त भारतीयांना सरदारांच्या विषयी असलेल्या जिज्ञासेला नक्कीच पूर्ण करेल.