Your cart is empty now.
आधुनिक काळातील भारताची अतिशय महत्त्वपूर्ण उपलब्धी म्हणजे भारतीय संविधान होय. भारतीय संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा होय. आपले भारतीय संविधान अप्रतिम आहे. आतापर्यंत आपल्या देशात वर्ण, जाती आणि धर्माच्या आधारावर विषमता हे एक मूल्य होते. सामाजिक जीवनात कधीच समता नव्हती. अशा परिस्थितीत भारतीय राज्यघटनेद्वारा स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मानवी मूल्ये भारतीय जीवनात लागू केलीत. देशात ‘एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य’ हे तत्त्व प्रस्थापित केले. देशातील सर्व लोकांना मानवी मूल्ये बहाल करून देशात लोकशाहीची स्थापना केली. आपल्या देशात संविधानाने घडवून आणलेली ही अद्भुत आणि फार मोठी क्रांती आहे. या क्रांतीचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत.
आपल्या देशाच्या संविधानाची प्रास्ताविका अतिशय समर्पक आणि अर्थपूर्ण आहे. भारतीय प्रास्ताविकेत संविधानाचा संपूर्ण सार आला आहे. प्रास्ताविकेची सुरुवात ‘आम्ही भारताचे लोक’ या शब्दांनी करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार असल्यामुळे आपल्या देशाचे संविधान हे परिपूर्ण आणि अप्रतिम बनले. भारतीय संविधानाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करणे हे राज्यकर्त्यांवर अवलंबून असते. ही बाब तितकीच महत्त्वाची आहे. आमचे मित्र आणि लेखक प्रा. भरत शिरसाठ यांनी ‘भारतीय संविधानाचे अनंत उपकार’ या पुस्तकात भारतीय संविधानाची ओळख अतिशय सोप्या भाषेत करून दिली आहे. त्याबद्दल प्रा. शिरसाठ यांचे मन:पूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!