Your cart is empty now.
बदलत्या काळानुसार जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्येही स्थित्यंतर होत जाते. काही क्षेत्रात हे स्थित्यंतर जलद गतीने होते तर काही क्षेत्रात गरजेनुसार पण धीम्या गतीने होत असते. शिक्षणक्षेत्रातही होत जाणारा बदल यास अपवाद नाही. पारंपरिक शिक्षणाच्या चौकटीबाहेर आता कौशल्याधारित शिक्षणाचा आग्रह धरला जात आहे. तो कालसुसंगत आणि अनिवार्य असाच आहे. भाषा आणि साहित्य या विद्याशाखांत आता आंतरविद्याशाखीय अभ्यासाची गरज वाढू लागली आहे. तिची उपयुक्तताही सर्वमान्य झाली आहे. भाषाव्यवहारात तर लेखनकौशल्याला पर्याय नाही. हे लेखनकौशल्य कोणकोणत्या प्रकारचे असते आणि त्याची बलस्थाने काय असू शकतात याचा परिचय ‘भाषाः लेखनकौशल्य आणि शासनव्यवहार’ या ग्रंथात वाचायला मिळतो. विशेषतः मुद्रित माध्यमासाठी आणि त्यातही जनसामान्यांशी घट्ट नाळ जोडल्या गेलेल्या वृत्तपत्रासारख्या माध्यमात कोणत्या प्रकारची लेखनकौशल्ये आवश्यक आहेत, त्याचे विवेचन या पुस्तकात आढळते. वृत्तपत्रीय लेख, अग्रलेख, स्तंभ वा सदरलेखन, परीक्षण या लेखनप्रकाराचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये नव्या पिढीतील अभ्यासक डॉ. संदीप कडू माळी यांनी सहजगत्या उलगडून दाखवली आहेत.
भाषिक कौशल्यविकास आणि शासनव्यवहार, मराठी राजभाषा अधिनियम यासंबंधी मौलिक माहिती या ग्रंथात वाचायला मिळते. मराठीविषयक कार्य करणाऱ्या शासकीय संस्थांचा परिचय प्रत्येक मराठी भाषकाला असायलाच हवा. त्यासंबंधीचा तपशील माहितीपूर्ण असाच आहे.
डॉ. संदीप कडू माळी हे बहुश्रूत आणि व्यासंगी प्राध्यापक आहेत. अध्यापनाच्या क्षेत्रात जबाबदारीने वावरताना कर्तव्यबुद्धीने परिश्रमपूर्वक कार्यरत राहायला हवे, असा त्यांचा प्रयत्न असतो. त्या प्रयत्नाचा भाग म्हणूनच या ग्रंथाकडे पाहायला हवे.
– डॉ. मनोहर जाधव