Your cart is empty now.
जाब विचारणे हे मूल्य संघर्षशील माणसांना प्रेरणा देणारे असते. जीवनाचे यथार्थ सत्य जाणून घेण्यासाठी माणसांच्या संघर्षाच्या तळापर्यंत पोहचावं लागतं. सामाजिक सत्याचं सौंदर्य दर्शन आणि माणूसपणाला समजून घेणारं संवेदनशील मन ही काव्यनिर्मितीची नैतिकता आहे.
प्रा.सदाशिव सुर्यवंशी यांची कविता याच अंगातून वैविध्यांनी वाढीस लागली आहे. जागतिकीकरणात नव्याचे आकलन आणि त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी, त्याला स्वीकारण्याचे धाडस केवळ परिवर्तनप्रवाही विचारांमध्येच आहे. जुन्या पानगळीची कृतज्ञता मनात ठेवून नव्या पालवीचं स्वागत हे सत्यदर्शी, सजग, सृजनात्मक वृत्तीच्या जडणघडणीचे द्योतक आहे.
धर्माधिष्ठीत रूढी, परंपरांच्या जोखडाखाली अडकून पडलेलं माणूसपण, माता भगिनींवरील अमानवी अत्याचार, जनसामान्यांच्या शोषणाचा, त्यांच्या लढ्याचा, जय-पराजयाचा आणि कृषी संस्कृतीच्या नात्यांमधील घटकाचा धांडोळा डॉ.सदाशिव सुर्यवंशी यांच्या अभिव्यक्तीतून ठळकपणे आलेला जाणवतो.
निसर्गाचं, मानवी हक्कांचं आणि मूल्यांचं होणारं अध:पतन, भोवतालचे सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरण, अस्मानी आणि सुलतानी संकटांचं चित्रण मोजक्या शब्दात, नेमका आशय गुंफत संयमित भाषेत मांडला आहे. बोलीच्या वाङ्मयीन सामर्थ्याचा उठाव म्हणजेच ‘माणूस जाळण्याच्या अटीवर’ हा काव्याविष्कार.
मराठी साहित्यात या संग्रहाचं प्रेमपूर्वक स्वागत.
– नारायण पुरी
तुळजापूर
Manus Jalnyachya Ativar