Your cart is empty now.
हे पुस्तक लोकगीतांचा अभ्यास अथवा संशोधनाच्या हेतूने लिहीले नसून घरात पडून असलेला ओव्यांचा मौलिक ठेवा घरात तसाच पडू न देता, जाणकार वाचकांना समर्पित करावा, याच भावनेतून सदर लेखनप्रपंच मांडला आहे. हे पुस्तक लिहिल्यामुळे नोकरीत मला बढती मिळणार नाही की पगार वाढणार नाही. मी एक सामान्य माणूस, माझ्या शैक्षणिक व वैचारिक आवाक्यात बसेल तेवढे व जमेल तसे लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. दुसऱ्या भागातील लेख व पत्र दैनिक सकाळ, गावकरी, तरूण भारत, जनशक्ती व देशोन्नती दैनिकांमध्ये प्रकाशित झालेले असून त्यांच्यात किंचीत नवी भर घालून त्यांची नव्याने मांडणी केली आहे. महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही माझी श्रध्दास्थळे तर आहेतच. त्याशिवाय शंकरराव खरात, प्रा. रा. ग. जाधव व प्रा. वसंत कानेटकर ह्यांच्याविषयी देखील माझ्या मनात आदराची भावना असल्यामुळेच लहान सहान लेखात का होईना माझी श्रध्दासुमने त्यांना अर्पण केली आहेत. तसेच रामदास
कामत, मा. दत्ताराम, हंसा वाडकर ह्या स्मृतीचित्रांना देखील मी थोडक्यात का होईना उजाळा दिला आहे.
समाजातील विचारवंत, कलावंत, लेखक व कविंवर मी प्रेम करतो. तसा सामान्य माणसांवरही मनापासून प्रेम करतो. मला निसर्गात होतो तसा सामान्य माणसांतही केव्हा केव्हा दिव्यत्वाचा साक्षात्कार होतो. मी पडलो तेव्हा सामान्य माणसानेच मला उठविले. रडलो तेव्हा सामान्य माणसानेच माझे अश्रू पुसले. अडखळलो तेव्हा सामान्य माणसानेच माझे बोट धरून मला पुढे नेले. आणि महत्वाचे म्हणजे मी वाईट मार्गावर चालत होतो, तेव्हा मला सन्मार्गावर आण्ण्याचे काम सामान्य माणसानेच केले. अशा ह्या माणूस नावाच्या तथागतांना वंदन करून माझे मनोगत इथेच थांबवतो.