Your cart is empty now.
नागपूरसारख्या शहरातच बालपणापासून वास्तव्यास असलेल्या आणि संगीत, नाटक, कविता यांच्या प्रगल्भ अभिरुचीने समृद्ध अशा आशा बगे यांचे कथा आणि कादंबरीलेखन समकालीन लेखिकांच्या लेखनात आपले वेगळेपण जपणारे आहे. अनुभवाचे चिंतन हाच लेखनाचा मुख्य गाभा असतो असे मानणारी ही लेखिका लेखनाकडे आपल्या घडण्याची प्रक्रिया म्हणून पाहते. माणसांचे आंतरिक वास्तव या लेखिकेने महत्त्वाचे मानले आहे. मध्यमवर्गीय एकत्र कुटुंबात, लहान गावांमध्ये, संस्कृतीत खोलवर रुजलेली माणसांची मुळे आणि परस्परांशी असणारे भावसंबंध आशा बगे यांच्या लेखनाचे ठळक वैशिष्ट्य ठरते. पारंपरिक मूल्यव्यवस्थेकडून आधुनिक व्यक्तिस्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करताना स्त्री-पुरुषांच्या वाट्याला येणारी वेदना, विशेषत: स्त्रीची मुक्ततेसाठी चाललेली धडपड त्यांच्या कथा व कादंबरीलेखनातून जाणवते.
आशा बगे ह्या गेली सुमारे चार दशके लेखन करीत आहेत. कथा आणि कादंबरी हे कथात्मक साहित्याचे दोन महत्त्वाचे वाङ्मयप्रकार त्या निष्ठेने हाताळीत आहेत. साहित्य अकादमीसारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासह कथात्मक लेखनाकरिता प्रदान केले जाणारे बरेच मानाचे पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेले आहेत.