Your cart is empty now.
विविध प्रदेश बोलींनी मराठी भाषेला समृद्धी प्राप्त करुन दिली आहे.उत्तर महाराष्ट्रातील अहिराणी ही महाराष्ट्राची एक महत्त्वाची बोली आहे. अहिराणीचीच सहोदर असणारी लेवा गणबोली हीसुद्धा या प्रदेशातील एक प्रमुख बोली आहे. समूहबोली म्हणून तिचे वेगळे असे स्थान आहे. व.पु.होले यांचे या लेखसंग्रहातील लेखन लेवा गणबोलीतच सिद्ध झालेले आहे प्रदेश लोकरीति, जीवनव्यवहार, परंपरा, संस्कृतिविषयीचे हे कथन आहे. वर्तमान समाजमनाचा कानोसा लेवाबोलीतून घेतला आहे. त्यासाठी त्यांनी त्यांच्या लेखनरूपात मानसपात्रांच्या ‘बोलण्या’तूून सद्यःकालीन समाजाची विविध चित्रे रेखाटली आहेत. विविध जोडगोळ्यांच्या बोलण्यातून वर्तमान समाजमन आणि त्यावरचे समाजभाष्य प्रकटलेले आहे. लेवा बोलीतील ही संवादचित्रे आहेत. ग्रामीण समाज, शेती, लोकव्यवहाराच्या गोष्टी यात सांगितल्या आहेत. या जशा समाजाच्या भद्र-अभद्रपणाच्या गोष्टी आहेत तशाच त्या शहाणपणाच्या बोधकथाही आहेत. स्त्रीकष्टाच्या व त्यांच्या गुणांच्या कथा आहेत. एका प्रदेशातील समकालीन समाजावकाशाचे दर्शन त्यातून होते.
हा जीवनानुभव त्यांनी लेवाबोलीत संवादित केला आहे. जळगाव-बुलढाणा जिल्ह्यातील जिव्हाळकथनाने त्यास वैशिष्ट्यपूर्णता प्राप्त झाली आहे. ‘रे-भो’, ‘काभ्र’ अशा संबोधनरूपांनी हा भाषावकाश रचला आहे. ‘सन’,‘त’ व ‘ये’ कारान्त रूपांनी सजलेले हे कथन आहे.
समाज, संस्कृती, प्रदेशविशिष्ट शब्दकळा, समूहनिर्मित सुलभ उच्चाररूपे व प्रादेशिक वाहती गद्यलय या बोलीत आहे. बोलीरूपे ही जशी त्या त्या प्रदेशाची संवादकथने असतात, तशीच ती मुख्य भाषेलादेखील संपन्न करत असतात. सांस्कृतिक संचित आणि लोकव्यवहार साठवून ठेवणारे हे प्रादेशिक बोलीकथन निश्चितच महत्त्वाचे आहे.