Your cart is empty now.
‘उलंगवाडी’ तील कथांमध्ये ग्रामीण माणूस, त्याचे भावविश्व, त्याच्या वाट्याला येणारे ताणतणाव, त्याची सुखदुःखे, त्याची वंचना आणि विवंचना, त्याची भोळीभाबडी आशा व त्याच्या वाट्याला येणारा अपेक्षाभंग यांचे थेट नि प्रांजळ चित्रण आहे. कारण लेखकाची संवादशैली वास्तवदर्शी व हृदयस्पर्शी आहे, निवेदनशैली सरधोपट पण थेट काळजाला भिडणारी आहे, लेखनपद्धती चित्रमय व आशयवेधी आहे. ह्या मातीचा अंगभूत गुणधर्म असलेल्या भाषाशैलीमुळे तसेच वातावरणनिर्मितीला पूरक-पोषक अशा साध्यासुध्या निवेदन पद्धतीमुळे त्यांची लेखणी जनसामान्यांच्या बाजूने उभी राहते. शोषितांना वाचा फोडते, वंचितांच्या वेदनेला स्वर देते, त्यांच्या फसवणुकीची कड घेते. यासाठी ती शासनकर्त्यांचा, शोषकांचा बुरखा फाडायलाही मागे पुढे पाहत नाही. ती धीट, स्पष्टवक्ती, कोणाचीही भीडमुर्वत न ठेवणारी असल्यामुळे ग्रामीण जनसामान्यांच्या व्यथा-वेदनांना उजागर करते. पात्रे, घटना, वातावरण, निवेदन, भाषा तसेच कथार्थ या सार्यांची एकात्म प्रचिती ही अशोक कोळींच्या कथेची किमया आहे. कथा वाङ्मयाला एका वेगळ्या, आश्वासक उंचीवर त्यांनी निश्चितपणे नेलेले आहे.
– डॉ. शिरीष पाटील