Your cart is empty now.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे चिकित्सक, जिज्ञासू, विद्वान, विवेकी, धाडसी आणि समर्पित संशोधक असल्याचे श्रीमद्भगवद्गीता रहस्य खंड-1 व खंड-2 अभ्यासल्यावर लक्षात येते. हा अभ्यास करतांना अभ्यासकाने दुराग्रह व पुर्वग्रह बाजूला ठेवावेत, ज्ञानमुलक आणि भक्तिप्रधान असावे, निष्काम कर्मयोग साधण्यासाठीचे शुद्ध अंत:करण अभ्यासकात असावे. असे असले तरच श्रीमद्भगवद्गीता रहस्यामागील रहस्य उलगडू शकते. सांप्रदायिक टिकाकारांनी कर्मयोग गौण ठरवून गीतेची जी तात्पर्ये वर्णिली ती यथार्थ नसून ‘ज्ञानभक्तियुक्त कर्मयोग’ हेच गीतेचे तात्पर्य असल्याचे लोकमान्य टिळकांनी सिद्ध केले आहे. ज्ञानाशिवाय होणाऱ्या श्रौत-स्मार्त इत्यादी तांत्रिक क्रेियेने बुध्दिमान मनुष्याचे समाधान होत नाही; आणि उपनिषदांत सांगितलेला धर्म केवळ ज्ञानमय असल्यामुळे सामान्य लोकांस त्याचे आकलन होणे कठीण असते; शिवाय सन्यासमार्ग लोकसंग्रहास विरुद्ध असल्याचे दिसते. म्हणून बुद्धि (ज्ञान), प्रेम (भक्ति) व कर्तृत्व या सर्वांचा योग्य मेळ घालून मोक्षाला अंतर न पडता ज्याने लोकव्यवहारही सुरळीत चालेल असा ज्ञानमुलक, भक्तिप्रधान व आमरणान्त निष्काम कर्मयोग धर्म भगवंतांने गीतेत उपदेशिला आहे.
लो. टिळक कठोर कर्मयेागी होते म्हणून त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेवर भाष्य (खंड 1) व टिका (खंड 2) लिहल्या. त्यांनाच त्यांनी कर्मयोगशास्त्र असे नाव दिले. एकच कर्म करण्याचे अनेक योग, साधने किंवा मार्ग असतात. यापैकी पराकाष्ठेचा चांगला व शुद्ध मार्ग कोणता, तो नेहमी आचरता येईल की नाही, नसल्यास त्याला अपवाद कोणते व ते का उत्पन्न होतात, जो मार्ग आपण चांगला समजतो तो चांगला का किंवा ज्यास वाईट म्हणतो तो वाईट का आणि हा चांगले वाईटपणा कोणी व कोणत्या धोरणाने ठरवावा, इत्यादी गोष्टी ज्या शास्त्राच्या आधारे निश्चित करता येतात त्यास ‘कर्मयोगशास्त्र’ किंवा ‘योगशास्त्र’ म्हणतात. श्रीमद्भगवद्गीता रहस्य अथवा कर्मयोगशास्त्र खंड 1 च्या निर्मितीचे संपूर्ण श्रेय लेखक लोकमान्य टिळकांचे आहे. या ग्रंथातील आध्यात्मिक ज्ञान जनसामान्यांपर्यंत संक्षिप्त स्वरुपात पोहचवण्यासाठी केलेला हा प्रायोगिक प्रयत्न आहे. समाजात मुल्यांची रुजवन करण्याच्या शुद्ध हेतूने विद्यार्थी व अभ्यासक या नात्याने मनापासून, विवेकनिष्ठपणे अभ्यास करण्याचा प्रयत्न केला.