Your cart is empty now.
इतिहासाचे पुनर्लेखन ही जशी काळाची गरज आहे तसेच प्रादेशिक इतिहास लेखन हे सुद्धा आवश्यक आहे. आजपर्यंत भारतीयांनी प्रादेशिक इतिहासाकडे दुर्लक्ष केले. वास्तविक पाहता स्वातंत्र्याच्या चळवळीत हिंदुस्थानातील सर्व प्रदेशांचे योगदान आहे. पण त्यांच्या कार्याची फारशी नोंद झाली नाही. ती व्हावी या हेतूने हा ग्रंथ लिहिला आहे. यांत राजकीय चळवळीबबरोबर सत्यशोधक चळवळ, गुला महाराजांचे भिल्लांतील प्रबोधन, मंदिर प्रवेशाची चळवळ, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी झालेले प्रयत्न, हिंदुस्थानातील ग्रामीण भागात काँग्रेसचे प्रथमच भरलेले फैजपूरचे अधिवेशन व त्यात शेतकर्यांसंबंधी झालेले ठराव आदि अनेक गोष्टींचा आढावा घेतला आहे. खानदेशमध्ये मोठ्या प्रमाणात भिल्ल व आदिवासी लोक आहेत. त्यांनीच पहिल्या प्रथम ब्रिटीश सत्तेला खानदेशच्या भूमीवर विरोध केला. म्हणून खर्या अर्थाने ते महाराष्ट्रातील आद्य क्रांतीकारक होत. काझीसिंग व भागोजी नाईक आदि भिल्ल क्रांतीकारकांनी 1857 च्या उठावात भाग घेवून खानदेशमध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटविण्याचा प्रयत्न केला. अशा वंचित नि उपेक्षित जनता व प्रदेशाचा इतिहास उजेडात आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा ग्रंथ होय.