Your cart is empty now.
प्रज्ञासुर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार होणे ही मानव कल्याणाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. बाबासाहेबांनी मानवी जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारे लेखन व प्रबोधन केले आहे. त्यांच्या विचारांचा अनुनय हा समाजामध्ये मानवी मुल्य, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय यांची रुजवात करण्यास सदैव मार्गदर्शक राहील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे उद्धारकच नव्हेत तर तळागाळातील धार्मिक रूढी-परंपरा यांना छेद देऊन राष्ट्र उभारणीमध्ये संपूर्ण भारतातील दलित आणि दलितेतर, सवर्ण समाजातील कर्मठ विचार व अनिष्ठ रूढींपासून सुटका करून जनजागृती आणि सामाजिक चळवळीच्या माध्यमांतून राष्ट्र उभारणीमध्ये योगदान देण्याबाबत प्रयत्नशील होते. डॉ.बाबासाहेबांनी कठोर परिश्रम, अथक प्रयत्न, असामान्य तडफ आणि जाज्वल्य निष्ठा याद्वारे भारतातील व विदेशातील शक्य ते उच्च शिक्षण घेतले. आणि विद्वान पंडीत, चतुरस्त्र लेखक, स्वतंत्र वृत्तीचे आणि निर्भीड विचारवंत म्हणून नावलौकिक मिळविला. सामाजिक न्याय प्रस्थापित करणारा अलौकिक सेनानी व राष्ट्राला राज्यघटना दिल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जनमानसात स्थान अढळ राहील.
अनिती, अन्याय, अत्याचार व शोषणाच्या विरोधातील प्रखर लढ्याच्या उत्तुंग मानदंड असणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन काळात मांडलेले विचार आजही खूप मार्गदर्शक व संयुक्तीक वाटतात. तथागत गौतम बुद्धांची शांती, छत्रपती शिवरायांची क्रांती व संत कबिरांची व महात्मा फुलेंची माणूसकी इ. सुंदर मिश्रण होवून त्यांचे विचार व कृती माणसाला प्रगतीच्या, प्रकाशाच्या दिशेने घेवून जातात. तसेच स्वाभिमानाने जीवन जगायला शिकवतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनकार्य, त्यांचे कृतीशील तत्वज्ञान, त्यांची विचारधारा समस्त भारतीयांसाठी दिपस्तंभ आहेत. त्यातूनच आम्ही उद्याच्या शांतीचा संदेश देणार्या व प्रसंगी क्रांतीसाठी तयार असणार्या समृद्ध, सशक्त व स्वाभिमानी भारताची निर्मिती करू शकतो.