Your cart is empty now.
राष्ट्रीय सुरक्षा याचा अर्थ राज्याचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्त्व, सुरक्षितता व अखंडतेचे रक्षण असा होतो. राष्ट्रीय सुरक्षा हे राष्ट्रहिताचे प्राथमिक व मूलभूत उद्दिष्ट मानले जाते. प्रत्येक राष्ट्राची राष्ट्रीय हिताची कल्पना ही वेगवेगळी असते. आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक राष्ट्रांचा राष्ट्रीय सुरक्षितता हा प्रश्न राष्ट्रीय जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. राष्ट्रीय हिताचे पर्यायाने राष्ट्रीय सुरक्षेचे संरक्षण करण्याची जबाबदारी जशी सेनादलाची असते तशीच ती देशातील कर्तव्यदक्ष आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांचीसुद्धा असते.
भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेचा विचार केल्यास, 1947 सालापासून पाकिस्तान, 1962 पासून चीन या दोन्हीही बहिर्गत शत्रूपासून भारताच्या राष्ट्रीय सुरक्षिततेला वेळोवेळी आव्हान दिले गेले. त्याचप्रमाणे दहशतवाद, विप्लववाद, नक्षलवाद, आर्थिक विषमता, बेरोजगारी, सामाजिक व आर्थिक परिस्थिती हे ही घटक भारताच्या अंतर्गत सुरक्षिततेपुढे केंव्हाही धोका निर्माण करू शकतात.
आंतरराष्ट्रीय संबंधात सुरक्षेचे महत्त्व मोठ्या प्रमाणात आहे. ज्याप्रमाणे सत्ता, न्याय, शांतता, समानता, स्वातंत्र्य या शब्दाचे स्वतःचे अस्तित्व आहे त्याचप्रमाणे राष्ट्रीय सुरक्षेचेही अस्तित्व आहे.