Your cart is empty now.
इसवी सनाच्या अठराव्या शतकात ब्रिटिश समाजात प्रबोधन झाले होते. समाजाचे आधुनिकीकरण ही झाले होते. परंतु भारतातील समाज मात्र सामाजिक आणि धार्मिक अंधश्रद्धेत गुरफटला गेला होता. धर्म व समाजात अनेक प्रकारच्या अनिष्ट प्रथा व चालीरितीचे प्राबल्य निर्माण झाले होते. अस्पृश्यतेच्या नावाखाली अस्पृश्यांना वाईट व अपमानास्पद वागणूक दिली जात होती, तर स्त्रियांवर अनेक प्रकारचे निर्बंध लावले जात होते. समाजात बालविवाह, सती प्रथा, जातीभेद, अस्पृश्यता इत्यादी प्रथा प्रचलित होत्या. या सर्व प्रथा समाजाला घातक होत्या. धर्मातही अनेक प्रकारच्या अनिष्ट प्रथा रुढ झालेल्या होत्या. त्यामुळे धर्माचे मूळ तत्त्वज्ञान बाजुला पडले होते. म्हणूनच मूळ धर्म काय आहे, हेही समाजाला समजावून सांगणे आवश्यक होते. अशावेळी ब्रिटिश धर्म व संस्कृतीने प्रभावित झालेल्या भारतीय विद्धानांनी भारतात धर्म आणि समाज सुधारणा चळवळ सुरु केली. या चळवळीचे जनक राजा राममोहन रॉय ठरतात. पारशी, शीख व मुस्लिम समाजांतही समाज सुधारणा चळवळी झाल्या. दलितांचा उद्धार, अस्मृपश्ता निर्मूलन व स्त्रियांच्या उन्नतीसाठीही चळवळी झाल्या. या सर्व चळवळींचा इतिहास प्रस्तुत ग्रंथात दिला आहे.