Your cart is empty now.
पुस्तकात कोरे शब्द असतात. शब्दांची अनुभूती घेण्यासाठी जीवनभूमीवर उतरावं लागतं. जीवन जगणे आचरणशील बनल्याशिवाय ज्ञानही प्राप्त होत नाही, शहाणपणही अनुभवता येत नाही. ज्योतिबा जीवन जगले म्हणजे शब्दांना आचरणात आणलं. सातत्यपुर्ण परोपकारासाठी जगले. सेवेचा सुगंध अनुभवला. त्यागाची चमक आकर्षित करीत असली तरी त्यामागचे दररोजचे होरपडून निघणे सहन केले. सर्व विपरित परिस्थितीवर मात केली. नितीने व धाडसाने चारित्र्यसंपन्न जिवन जगले. सदाशिवच्या लग्नात झालेल्या अपमानातून ज्योतिबांच्या मनातली ज्योत अधिक प्रखर झाली. वडीलांनी घर सोड म्हटल्यावर, आपल्या ध्येयापासून विचलीत न होता, सावित्रीबाईंसह घर सोडणे पसंत केलं. 100 वर्षांपूर्वीची भयावह परिस्थिती अंगाखांद्यावर खेळवत समाजकारण अधिक गतीमान करीत राहिले. उच्चनीचभाव, गरीब, ग्रामीण, शेतकरी, कष्टकरी, महिला इत्यादींचा प्रश्नांवर ज्योतिबांनी समर्पित योगदान दिलं. शेतकऱ्यांचा आसुड व गुलामगिरी सारखे ग्रंथ लिहून जागृत समाज निर्मितीसाठी खपले. ज्योतिबा व सावित्रीबाई यांनी मुलींच्या शिक्षणासाठी तत्कालीन वर्चस्ववादी व प्रस्थापित समाजाबरोबर संघर्ष केला. ही बाब केवळ असामान्यच नव्हे तर जीवावर उदार होवून लढणं आहे. या असामान्य व अतुलनीय संघर्षातून ज्योतिबा महात्मा पातळीपर्यंत पोहोचले. तरूण-तरूणींना नम्र निवेदन की त्यांनी ही छोटीशी पुस्तिका वाचावी. आपल्यासाठी आयुष्यपणाला लावणाऱ्या महात्मा ज्योतिबांसाठी फक्त एकच दिवसाचा वेळ द्यावा. मला खात्री आहे जीवन केवळं मौल्यवान असतं याची आपणास जाणीव होईल.