Your cart is empty now.
वेद, उपनिषदे, भगवद्गीता, योगशास्त्र, सांख्यशास्त्र, अद्वैत वेदांत, भ. बुद्धांचे तत्त्वज्ञान, भगवान महावीर व गुरुनानक यांची शिकवण, ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांसारख्या संतांचे अभंग, गीता रहस्य इत्यादी भारतीय संस्कृतीचे तत्त्वज्ञान आणि अध्यात्म इत्यादी जगात सर्वोच्च मानले जाते. सुसंस्कारित व विश्वबंधुत्ववादी जगत निर्माण करण्यासाठी उपरोक्त सारे ग्रंथ जगाला मार्गदर्शक आहेत. जगाच्या कल्याणाचा विचार करत तत्कालीन ऋषीमुनींनी आणि संतांनी पवित्र ग्रंथांच्या मार्फत उच्च दर्जाचे अध्यात्म पुढील पिढ्यांसाठी निर्माण केलेले आहे, याची दुर्दैवाने आपल्यातील बहुतेकांना जाणीव नाही. या आध्यात्मिक तत्त्वज्ञानाकडे एखाद्या धर्माचे ग्रंथ म्हणून बघू नये.पृथ्वीतलावरील प्रत्येक मनुष्याच्या कल्याणासाठीचे हे अध्यात्म आहे याचा विवेक जागृत असू द्यावा. या आध्यात्मिक तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या पवित्र ग्रंथांचे आपण चिंतन, मनन, निदिध्यासन करायला हवे. या आध्यात्मिक ग्रंथांच्या शिकवणुकीतून अर्जुनासारखा योद्धा, भ.गौतम बुद्ध, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, महात्मा फुले, रवींद्रनाथ टागोर, स्वामी अरविंद घोष, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज इत्यादी महान आध्यात्मिक विभूती निर्माण झाल्या. यांच्यातील खोलवर आध्यात्मिकतेमुळे हे जगाच्या कल्याणासाठी निष्कामपणे नियत कर्म कर्तव्य करीत राहिले आणि त्यांनी जगाचा उद्धार साधला. थोडक्यात उपनिषदे, भगवद्गीता इत्यादी पवित्र ग्रंथ आध्यात्मिक महापुरुष घडवणारे मनोविज्ञान आहेत, मानसशास्त्र आहेत. या आध्यात्मिक ग्रंथांबाबत संक्षिप्त स्वरूपात या पुस्तकाद्वारे आपण माहिती करून घेणार आहोत.
अध्यात्माची महती सर्वांना समजावी यासाठी या पुस्तकाची निर्मिती झाली आहे.