देशाच्या स्वातंत्र्यासाठी, असहकार चळवळ 1920, जंगल सत्याग्रह 1930, नंदुरबार येथे गोळीबार, चलेजाव आंदोलनातील बॉम्ब स्फोट, आदिवासी भागात चळवळीचे लोण, नंदुबार जिल्ह्यातील शिक्षा भोगलेले देशभक्त, भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आत्मसमर्पण केलेल्या हुतात्म्यांचा कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ बनवलेल्या शिलालेखातील व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध झालेल्या नावांची यादी इ. मुद्द्यांच्या सहाय्याने स्वातंत्र्य लढ्यातील नंदुरबार जिल्ह्याचे योगदान रेखांकित करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर देखील कित्येक जिल्हे, तालुके, गावे असे आहेत की ज्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अजून देखील सर्व सामान्य वाचकांपर्यंत आलेले नाही. आदिवासी बहूल म्हणून ओळखला जाणारा नंदुरबार जिल्हा हा त्यापैकीच एक आहे. पुस्तक वाचल्यानंतर हे सहज लक्षात येते की, सुप्रसिद्ध अशा सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेला नंदुरबार जिल्हा स्वातंत्र्य चळवळीत इतर जिल्ह्याप्रमाणे अग्रेसर राहिलेला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून डॉ.टाटिया यांनी येथील बाल स्वातंत्र्य सैनिक शिरीष कुमार व त्याच्या साथीदारांवर ब्रिटीशांनी केलेला गोळीबार, जालियनवाला बाग हत्याकांडाप्रमाणे रावला पाणी येथे ब्रिटिशांनी केलेला नरसंहार या प्रसंगांना वाचा फोडण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो स्तुत्य, प्रशंसनीय व आदर्शवत असा आहे.
– प्रा. सुनील कुलकर्णी
संचालक, विद्यार्थी विकास विभाग,
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.