जगातील कोणत्याही देशात जास्तीत जास्त उद्योजकतेची घडवणूकच त्या राष्ट्राला किंवा देशाला जगात सर्वश्रेष्ठ ठरवू शकते. म्हणूनच उद्योजकतेला सर्वच राष्ट्रांमधून महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे. गुणवत्तापूर्ण उद्योजकता ही कारखान्यातून तयार करता येत नाही, तर ती उद्योजकीय संस्कारातूून व उद्योजकीय प्रशिक्षणातून घडविता येवू शकते. तेव्हा आपण धाडसाने असे निश्चितच म्हणू शकतो की, तुम्ही उद्योजकता घडवा, उद्योग आपोआप उभे राहतील. यावरून उद्योजकता ही किती महत्त्वपूर्ण आहे हे आपल्या लक्षात येईल. उद्योजकता ही देशाला तसेच समाजाला आर्थिक सुबत्ता प्राप्त करून देते. तेव्हा येणाऱ्या कालावधीत युवक युवतींमध्ये जास्तीत जास्त उद्योजकतेची रूजवणूक कशी करता येवू शकेल याचा विचार होणे आवश्यक आहे. म्हणूनच महाविद्यालयीन शिक्षणातून उद्योजकता विकासाचे शिक्षण सर्वच ज्ञानशाखांमधून दिले पाहिजे. उद्योजकता या संज्ञेत धीटपणा, निर्भयता, गतीक्षमता, नवनिर्मिती व धोका पत्करण्याची तयारी हे सर्व गुणवैशिष्ट्ये एकत्रित येतात. प्रत्येक देशाला उद्योजकता विकासाला महत्त्व द्यावे लागते कारण उद्योजकतेच्या विकासावर त्या देशाची प्रगती अवलंबून असते.